Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, June 27, 2017

    राजर्षी शाहू महाराज

    Views

    राजर्षी शाहू महाराज


                              राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक ! चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू

    महाराज , ( जून २६ , इ.स. १८७४ - मे ६ , इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
                               राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

                             राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
                              बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला.
    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

                             राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.
                              राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

    लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांचे भरीव लोकोत्तर योगदान: 

    1. ▶1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले

    2. ▶1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले 

    3. ▶1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण 

    4. ▶2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.

    5. ▶1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला व वेठबिगाराची पद्धत बंद केली.

    6. ▶1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.

    7. ▶27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.

    8. ▶1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.

    9. ▶1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले.

    10. ▶1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली.

    11. ▶याच वर्षी नाशिक येथेउदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली.
    12.  ▶तसेच गोवध बंदी कायदा केला.

    13. ▶20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला. 

    14. ▶9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.

    15. ▶1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.

    16. ▶1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.

    17. ▶1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले

    18. ▶11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. 
    19. ▶याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.

    20. ▶शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.

    21. ▶कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.

    22. ▶1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).

    23. ▶सहकारी कायदा केला व सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.

    24. ▶1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला.

    25. ▶पाटील शाळांची सुरुवात केली.

    26. ▶कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.

    27. ▶1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले

    28. ▶बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयतशिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.

    29. ▶1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली

    30. ▶25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

    31. ▶1918 आंतरजातीय विवाहास कायद्याने मान्यता दिली

    32. ▶कुलकर्णी व महार वतने रद्द केली.

    33. ▶जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या

    34. ▶आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.

    35. ▶गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.

    36. ▶तलाठी शाळा सुरु केल्या.

    37. ▶1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.

    38. ▶एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.

    39. ▶शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.

    40. ▶1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला

    41. ▶देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली

    42. ▶हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले

    43. ▶पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला.



    महत्वाच्या संस्था-




    1. शाहू कापड गिरणी, कोल्हापूर
    2. शाहू कुस्ती मैदान, खासबाग (कोल्हापूर) 
    3. शाहू कॉलेज, पुणे
    4. शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
    5. राजर्षी शाहू जलतरण तलाव, मोहननगर(पिंपरी-पुणे)
    6. छत्रपती शाहू पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली); संसद प्रांगण (नवी दिल्ली), दसरा चौक (कोल्हापूर)
    7. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू पुरस्कार
    8. शाहू भवन, बलिया (बिहार)
    9. छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, लखनौ (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!)