दसरा व विजयादशमी |
पैठण शहरात देवदत्त नावाच्या एका गृहस्थास कौत्स नावाचा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. तो विद्यासंपादनासाठी वरतंतु ऋषींच्या घरी येऊन राहिला. त्या काळात ऋषींच्या म्हणजे गुरूच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता. कौत्स जात्याच हुशार असल्यामुळे तो थोड्याच दिवसांत सर्व शास्त्रांत प्रवीण झाला. गुरूचा आश्रम सोडताना काय गुरुदक्षिणा द्यावी? या विचारात पडून त्याने गुरूलाच, ‘मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ?’ असे विचारले. वरतंतु म्हणाले, ‘गुरुदक्षिणेसाठी मी तुला विद्या शिकवली नाही. शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरूला गुरुदक्षिणा मिळाली.’ पण या उत्तराने कौत्साचे समाधान झाले नाही. तो पुनःपुन्हा ‘काय गुरुदक्षिणा देऊ?’ असे विचारीतच राहिला. शेवटी वरतंतु म्हणाले, ‘मी तुला चौदा विद्या शिकवल्या. प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे मला तू चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नकोत. एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजेत. गुरुजींची ही अट पाळणे कौत्सास थोडे कठीण गेले. त्यावेळी सिंहासनावर असलेला रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा पूर्वज, हा उदार आणि विद्वानांची कदर करणारा आहे, हे कौत्साला माहीत होते. तो मोठ्या आशेने रघुराजाकडे गेला. त्याने आपली मागणी रघुराजासमोर मांडली, पण त्यावेळी रघुराजाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती. राजापासून आपणास काही अर्थलाभ होण्याची शक्यता नाही, हे ध्यानी येताच कौत्स परत जाऊ लागला. आपल्या दारी आलेला याचक रिक्तहस्ताने परत जाऊ नये म्हणून रघुराजाने प्रत्यक्ष इंद्रावर चढाई करून त्याचाकडून सुवर्णमुद्रा आणाव्यात, असा निश्चय केला. हे इंद्राला समजताच इंद्राने अयोध्यानगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला. त्या सर्व सुवर्णमुद्रा रघुराजाने कौत्साला दिल्या. कौत्साने त्या आपल्या गुरूसमोर ठेवून त्या स्वीकारण्याची विनंती केली. गुरूंनी फक्त चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या कौत्सास परत दिल्या. परत मिळालेल्या सुवर्णमुद्रा या आपल्या नव्हेत,म्हणून कौत्साने रघुराजाकडे त्या परत आणल्या. पण रघुराजा म्हणाला, ‘या माझ्याही नव्हेत, आता त्या तुझ्याच आहेत. मी त्या घेणार नाही.’ कौत्साला ते पटले नाही. त्याने ज्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा पूर्वी मिळाल्या होत्या तिथे त्या नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून नेण्यास सांगितले. हा दिवस होता विजयादशमीचा. आपल्या पुराणात विजयादशमीसंबंधी विविध स्वरूपाच्या अनेक कथा आहेत. ही वरतंतु आणि कौत्स या गुरू-शिष्यांची गोष्ट आपणास काय सांगते? यामध्ये गुरूचे ऋण फेडण्याची शिष्याची तळमळ दिसते. आपण शिकविलेल्या ज्ञानाची पैशाच्या हिशेबात किंमत होऊ शकत नाही, हा गुरूचा तेजस्वी विचार दिसतो. विद्वान पंडितांची चिंता दूर करण्याची राजाची कळकळ दिसते आणि जे आपले नाही त्याचा स्वीकार करण्यास राजा रघु, गुरू वरतंतु आणि त्यांचा शिष्य कौत्स यापैकी कोणीही तयार होत नाहीत, यामागची त्यांची निरिच्छता दिसते. म्हटले तर ह्या गोष्टीपासून काही बोध निश्चितच मिळण्यासारखा आहे.
No comments:
Post a Comment